IMD Weather update: महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यांचा इशारा हवामान खात्याने दिला. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली.
IMD Weather update: महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं संकट अधिकच गडद झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. आता भारतीय हवामान विभागानं (IMD) आणखी एक मोठा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस अतिशय धोक्याचे ठरण्याची शक्यता असून, अनेक भागांत मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांचा तडाखा बसू शकतो.
IMD च्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागांत मुसळधार पावसाबरोबरच वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलेला असताना, या नव्या इशाऱ्यामुळे त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
दरम्यान, मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जालना शहर आणि जिल्ह्यात अनेक भागांमध्ये दमदार पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. वाऱ्याचा वेगही ताशी ४० ते ५० किलोमीटर पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगड राज्यांनाही पावसाचा इशारा दिला आहे. देशभरातच हवामान अस्थिर बनलेलं असून, अनेक भागांत अतिमुसळधार पावसाचा धोका आहे.
या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं, असा सल्ला देण्यात आला आहे. गारपीट, वादळ आणि मुसळधार पावसामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून बचावासाठी योग्य ती तयारी ठेवण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.