सार

‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या युद्धबंदीवर शरद पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या नेत्यांनी लष्कराच्या कारवाईचे कौतुक केले असून, शांततेला प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे.

मुंबई: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान जाहीर झालेल्या युद्धबंदीवर देशभरातून तसेच महाराष्ट्रातील विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. या कारवाईमुळे देशात आणि सीमावर्ती भागांत तणावाचं वातावरण काहीसे निवळल्याचं दिसून येत आहे. जाणून घेऊया शरद पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत.

शरद पवार: “दहशतवादी तळांवर अचूक प्रहार, युद्धाचा हेतू नव्हता”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, “भारताने कधीही दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती.”

ते पुढे म्हणाले, “भारत नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक राहिला आहे. मात्र, दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेणं हे आंतरराष्ट्रीय जबाबदारीचं काम आहे.”

 

Scroll to load tweet…

 

सुप्रिया सुळे: “भारतीय लष्कराचा आम्हाला सार्थ अभिमान”

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भारतीय लष्कराने अल्पावधीतच आपली ताकद दाखवून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा प्रतिशोध घेतला गेला, हे प्रत्येक देशवासीयासाठी समाधानकारक आहे.”

त्यानंतर त्या म्हणाल्या, “या कारवाईत काही जवान शहीद झाले, तर काही निष्पाप नागरिकही मृत्युमुखी पडले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या बलिदानाचे स्मरण प्रत्येक भारतीय करत राहील.”

 

Scroll to load tweet…

 

आदित्य ठाकरे: “सीमावर्ती जनतेच्या धैर्याला सलाम”

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही आपली भावना व्यक्त करत म्हटलं, “आपल्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या लष्कराला सलाम! तसेच सीमावर्ती जिल्ह्यांतील नागरिकांच्या धैर्याला, शौर्याला आणि सहनशक्तीला मानाचा मुजरा.”

ते पुढे म्हणाले, “युद्धसदृश परिस्थितीत नागरी सेवांचा समतोल राखण्यासाठी जे अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस काम करत होते, त्यांचेही आभार. आपला देश अशा एकतेच्या बळावरच सुरक्षित राहतो.”

‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा संघर्षविराम हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारताने दहशतवादाला सडेतोड उत्तर देताना आंतरराष्ट्रीय शांततेचा धागाही जपला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांच्या प्रतिक्रियांनी लष्कराच्या कर्तृत्वाचे कौतुक करत, युद्धापेक्षा शांततेला प्राधान्य देण्याची भूमिका अधोरेखित केली आहे.

जय हिंद!

 

Scroll to load tweet…

 

रोहित पवार: "पाकिस्तानने पुन्हा एकदा पराभवाची धूळ चाखली!"

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पाकिस्तानवर सडकून टीका करत म्हटले, “खायलाही महाग असूनही शांततेचा तिटकारा असलेला पाकिस्तान भारताला युद्धाच्या खाईत लोटतोय. अशा वेळी प्रत्येक भारतीय एकत्र उभा राहतो. इतिहासातही असंच घडलं आणि आजही आम्ही सरकार आणि लष्कराच्या पाठीशी ठामपणे आहोत.” “बुद्धाच्या भारताला युद्धात ओढणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाची धूळ चाखावी लागली!”

 

Scroll to load tweet…