महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून शेतकरी कर्जमाफीबाबत एक मोठा गौप्यस्फोट समोर आला आहे. मंत्री प्रकाश आबिटकर यांनी 'लाडकी बहीण' योजनेमुळे कर्जमाफीच्या निर्णयाला विलंब होत असल्याचा दावा केला आहे.

कोल्हापूर: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड हालचाली सुरू असताना राज्याच्या मंत्रिमंडळातून एक मोठा गौप्यस्फोट समोर आला आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारकडून अद्याप ठोस निर्णय का घेतला जात नाही, यावर अखेर खुद्द मंत्री प्रकाश आबिटकर यांनीच मौन सोडलं आहे. सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेमुळेच कर्जमाफीच्या निर्णयाला विलंब होत असल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.

"लाडकी बहीण" योजनेचा भार आणि कर्जमाफीतील अडथळा

राज्य सरकारच्या "लाडकी बहीण" या योजना सध्या महिलांसाठी आश्वासक ठरत असल्या, तरी या योजनेचा आर्थिक भार सरकारवर मोठ्या प्रमाणात पडत आहे. याचमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडल्याचं प्रतिपादन मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, "राज्य चालवत असताना 'लाडकी बहीण' योजनेसाठी मोठा निधी लागत आहे, त्यामुळेच कर्जमाफीला उशीर होत आहे."

या विधानामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये असलेली अस्वस्थता आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आक्रमक असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी तर सलग सात दिवस अन्नत्याग आंदोलन केलं. त्यांचा लढा सरकारच्या लक्षात येण्यासाठीच होता, असे त्यांनी स्पष्ट केलं होतं.

"वेळकाढूपण नव्हे, तर आर्थिक जबाबदारी", आबिटकर यांची स्पष्टोक्ती

आबिटकर म्हणाले, "सरकारकडून उशीर होणं म्हणजे वेळकाढूपणा नाही. सध्या आर्थिकदृष्ट्या सरकारवर प्रचंड बर्डन आहे. राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे थोडा वेळ लागत आहे." त्यांनी बच्चू कडूंना शेतकऱ्यांचा खरा लढवय्या नेता म्हणून गौरवले आणि त्यांची तब्येतही सरकारसाठी महत्त्वाची असल्याचे नमूद केले.

पंढरपूर वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष तयारी केली आहे. मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, “वारीसाठी 1500 डॉक्टरांचा स्टाफ, ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध केली जाणार आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.” करोनाबाबतही त्यांनी आश्वस्त केलं. "सध्या करोना रुग्णसंख्या वाढत असली, तरी घाबरण्याची गरज नाही. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य काळजी घेतली जाईल."

राजकीय भूकंपाची नांदी?

प्रकाश आबिटकर यांचा हा गौप्यस्फोट राजकीय वर्तुळात चर्चा आणि वादाला तोंड फोडणारा ठरत आहे. महिलांसाठीची महत्त्वाची योजना आणि शेतकऱ्यांसाठीची अपेक्षित कर्जमाफी या दोघांमधील समतोल साधणं हे सरकारसमोरील सर्वात मोठं आव्हान बनलं आहे.