वसईत कोरोनामुळे एका 43 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
राज्यात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने डोके वर काढले आहे. मागील काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असून, वसईत नुकताच कोरोनाचा पहिला बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत. नागरिकांनीदेखील अधिक जबाबदारीने वागण्याची गरज निर्माण झाली आहे.
वसईत कोरोनाचा पहिला बळी
वसईच्या ग्रामीण परिसरातील भंडारआळी, खोचिवडे येथील 43 वर्षीय विनीत विजय किणी यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना मुंबईतील रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर काही तासांतच, सकाळी 7.12 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना संपूर्ण परिसरासाठी धोक्याची घंटा आहे.
महाराष्ट्रात रुग्णसंख्येत वाढ
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 43 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात एकूण 467 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. देशपातळीवर बघितल्यास, केरळमध्ये सर्वाधिक 189 रुग्ण असून, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 89 रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी पाहता, देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे स्पष्ट होते.
नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?
सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर सर्दी, खोकला, ताप अशा आजारांची शक्यता वाढते. या लक्षणांची आणि कोरोना विषाणूच्या लक्षणांची समानता असल्यामुळे कोणताही त्रास अंगावर न काढता तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, नागरिकांनी पुढील उपाययोजना करणे आवश्यक आहे:
सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे
वारंवार हात स्वच्छ धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे
लक्षणं दिसताच तत्काळ कोरोना चाचणी करून घेणे
घरीच विलगीकरण पाळणे आणि इतरांना संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेणे
आरोग्य विभागाशी संपर्क ठेवणे आणि सरकारी सूचनांचे पालन करणे
प्रशासनाचे आवाहन
वसई तालुका आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही लक्षणं जाणवल्यास दिरंगाई न करता वैद्यकीय उपचार सुरू करण्याचे आवाहन केले आहे. ठाण्यातही काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एक बळी गेल्याचे निदर्शनास आले होते.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वांनी सजग राहणे गरजेचे आहे. थोडीशी काळजी घेतल्यास आपण स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो.