सार

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात अजूनही आरोपींवर कठोर कारवाई न झाल्याने अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते आक्रमक झाले आहेत. 

Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभरात तीव्र चर्चा आणि संतापाचं केंद्रबिंदू ठरलं आहे. या प्रकरणावर भाजपच्या आमदार आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नांदेडमध्ये भाजपतर्फे आयोजित सिंदूर यात्रा कार्यक्रमात सहभागी झालेल्या वाघ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, "वैष्णवीच्या मृतदेहावर असलेल्या जखमा आणि खुणा पाहता, तिची हत्या सासरच्या लोकांनी केली आहे. हुंड्यासाठी तिचा छळ करण्यात आला. सोन्याची-चांदीची गौरी, चांदीची भांडी, फॉर्च्यूनर गाडी आणि ५१ तोळे सोनं घेतल्यानंतरही तिच्यावर मानसिक आणि शारीरिक त्रास सुरुच होता."

चित्रा वाघ यांचे रोखठोक वक्तव्य होते, "या प्रकरणातील आरोपी कोणत्याही पक्षाचे असो वा कोणाच्या ओळखीचे असो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना वाचू देणार नाहीत. मी वैष्णवीला न्याय मिळवून देईपर्यंत गप्प बसणार नाही. आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत हा लढा सुरू राहील."

तसेच त्यांनी इशारा दिला की, “या प्रकरणात कोणतीही क्षमा होणार नाही. या नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.”संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणामुळे संतापाचं वातावरण आहे. समाजातील महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी चित्रा वाघ यांनी घेतलेली ठाम भूमिका अनेकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ठरत आहे.