छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध सिद्धार्थ नगर उद्यानात पावसामुळे भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra News : छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानात पावसामुळे भिंत कोसळल्याने दोन महिला कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलांमध्ये स्वाती खैरनाथ (वय ३५, हल्ली मुक्काम रांजणगाव, मूळ गाव लासलगाव) आणि रेखा गायकवाड (वय ३८, सौभाग्य चौक, एन-११, हडको) यांचा समावेश आहे. या दोघीही महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या.
पावसामुळे भिंतीचा भाग कोसळला
संध्याकाळच्या सुमारास शहरात जोरदार वादळ आणि पावसाच्या सरींनी अचानक हजेरी लावली. याच दरम्यान सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा वरचा काही भाग निखळून खाली कोसळला. त्या भागात काही नागरिक उपस्थित असल्याने **भिंतीचे अवशेष थेट त्यांच्या अंगावर पडले.या घटनेत पाच जण जखमी झाले असून, त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
प्रवेशद्वाराचे काही वर्षांपूर्वीच नूतनीकरण
या दुर्घटनेनंतर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खरंतर, केवळ काही वर्षांपूर्वीच या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करण्यात आले होते, तरीही तो भाग इतक्या लवकर कसा कोसळला? नागरिक आणि स्थानिकांनी महानगरपालिकेच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
घटनेनंतर प्रशासनाची धावपळ
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जबाबदारी कोणाची?
या घटनेमुळे महानगरपालिकेच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही वर्षांपूर्वीच नूतनीकरण झाले असतानाही, अशा प्रकारे भिंत कोसळणे हे गंभीर दोष दर्शवते. नागरिक आता या घटनेची सखोल चौकशी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत आहेत.सिद्धार्थ उद्यान हे छत्रपती संभाजीनगरमधील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून, या दुर्घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.