बीड जिल्ह्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक अहवालाने सामाजिक आणि आरोग्यविषयक स्थितीचे भयावह वास्तव उघड केले आहे.
Beed News : बीड जिल्ह्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक अहवालाने सामाजिक आणि आरोग्यविषयक स्थितीचे भयावह वास्तव उघड केले आहे. ऊसतोडीचा हंगाम सुरु होण्याआधी दरवर्षी बीड जिल्ह्यातून सुमारे १ लाख ७५ हजार मजूर कामासाठी महाराष्ट्राबाहेर जातात. यामध्ये ७८ हजार महिला मजूरांचा समावेश आहे. या महिला आर्थिक गरजांमुळे अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि परिणामतः गंभीर आरोग्यविषयक समस्या उद्भवतात.
नुकत्याच झालेल्या एका तपासणीत असे आढळले आहे की, ८४३ महिलांनी ऊसतोडीसाठी जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. यातील ३० ते ३५ वयोगटातील महिलांची संख्या सर्वाधिक असून त्यामध्ये ४७७ महिलांचा समावेश आहे. पोटात दुखणे, मासिक पाळीत रक्तस्त्राव, जंतुसंसर्ग ही कारणे देत या महिलांनी गर्भपिशवी काढून घेतल्याचे नोंदवले गेले आहे. याचबरोबर अजून एक धक्कादायक बाब म्हणजे, बीड जिल्ह्यातील १,५२३ महिलांनी गरोदर अवस्थेतही ऊसतोडीचे काम केले असून ‘पोटात बाळ आणि पोटासाठी हाती कोयता’ ही परिस्थिती या महिलांच्या जीवनातील तणावदायक वास्तव अधोरेखित करते.
या महिलांची माहिती माता व बाल संगोपन पोर्टलवर नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे, या महिलांमध्ये रक्तक्षयाची स्थितीही गंभीर असून तब्बल ३,४१५ महिलांना रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेचा त्रास असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामागे लोह, बी-१२, फॉलिक अॅसिडची कमतरता, थलसेमिया तसेच मासिक पाळीतील रक्तस्राव किंवा शस्त्रक्रियेनंतरची अवस्था कारणीभूत आहे.
बीडमधील १,१३२ गावांमध्ये महिला आरोग्य कृती दल कार्यरत असून, या माध्यमातून ४६,२३१ महिलांची ऊसतोडीपूर्वी आरोग्य तपासणी करण्यात आली होती. याशिवाय, १५,६२४ महिलांना हेल्थ कार्डचे वाटप झाले असून, त्यातील २७९ शस्त्रक्रिया सरकारी डॉक्टरांच्या परवानगीने खासगी दवाखान्यांमध्ये करण्यात आल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. या सर्व तपासण्या आणि निष्कर्षांनी ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होत आहेत, हे स्पष्टपणे दिसून येते आणि यावर त्वरित आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची आवश्यकता आहे.