सार

Konkan Accident : रत्नागिरी येथे जगबुडी नदीपात्रात कार कोसळून अपघात झाल्याची दुर्घटना घडली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 

Konkan Accident : मुंबईहून कोकणातील देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघालेली एक कार भरणे नाक्याजवळील जगबुडी नदीच्या पुलावरून खाली कोसळल्याची दुर्घचना सोमवारी पहाटे रत्नागिरी जिल्ह्यात घडली. या दुर्घटनेत मुंबईहून कोकणात निघालेल्या पराडकर कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांची नावे : 

  • परमेश पराडकर
  • मेधा परमेश पराडकर
  • सौरभ परमेश पराडकर (22)
  • मिताली विवेक मोरे (45)
  • निहार विवेक मोरे (19)
  • श्रेयस राजेंद्र सावंत (23)

या अपघातात विवेक मोरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंत्यविधीसाठी निघालेले, परंतु मृत्यूचा प्रवास ठरला मुलुंडमधील मिरा रोड येथील मोरे कुटुंब व नालासोपारा येथील पराडकर कुटुंब रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कोकणातील देवरुख येथे मिताली मोरे यांचे वडील मोहन चाळके यांच्या अंत्यविधीसाठी रवाना झाले होते. मात्र, दुर्दैवाने हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील अखेरचा प्रवास ठरला.

अपघात कसा झाला? 
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाक्यावर, जगबुडी नदीवरील पुलावरून कार नियंत्रण सुटल्यामुळे थेट नदीपात्रात कोसळली. पहाटेच्या वेळी झालेला हा अपघात पाहून परिसरात खळबळ उडाली. खेड पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. मात्र, त्यात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सहाव्याचा मृत्यू रुग्णालयात झाला.

प्रशासनाची तात्काळ दखल
 अपघाताची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक वैशाली गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पालकमंत्री उदय सामंत यांनीही या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून, अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रस्ते सुरक्षा मंडळाची तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलिसांकडून अधिक तपास सुरू 
या अपघाताची नोंद खेड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, नेमकी अपघाताची कारणे जाणून घेण्यासाठी पोलीस सर्व अंगांनी तपास करत आहेत.