अनेक जण म्हणतात की नवरा-बायकोने एकाच ताटात जेवू नये. ही खूप जुनी मान्यता आहे. पण नवरा-बायकोने एकाच ताटात का जेवू नये याचं गुपित महाभारतातल्या भीष्म पितामहांनी सांगितलंय. याबद्दलच जाणून घेऊया अधिक...
आध्यात्मिक : आता एकत्र कुटुंबाऐवजी विभक्त कुटुंबात राहणं बहुतेक जोडपी पसंत करतात. कुटुंबव्यवस्थेची व्याख्या काळानुसार बदलत चालली आहे. यापैकीच एक गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये झालेला बदल. आजकाल बऱ्याच कुटुंबात नवरा-बायको एकाच ताटात जेवतात. यामुळे नवरा-बायकोमधलं नातं घट्ट होण्यासह त्यांच्यामधलं प्रेम वाढतं असं मानलं जातं.
पण शास्त्रात नवरा-बायकोने एकाच ताटात जेवणं चुकीचं असल्याचं मानलं जातं. याशिवाय महाभारतातले भीष्म पितामह यांनीही याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
नवरा-बायकोने एकाच ताटात का जेवू नये?
भीष्म पितामहांनी आदर्श आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. याचा उल्लेख महाभारतातही करण्यात आला आहे. भीष्म पितामह म्हणतात की, एक व्यक्ती आपल्या आयुष्यात अनेक नातेसंबंध जोडतो. याशिवाय त्या व्यक्तीवर आपल्या घरातल्या सदस्यांच्या प्रति काही जबाबदाऱ्या असतात. या जबाबदाऱ्या प्रत्येकाने पार पाडल्या पाहिजेत.
भीष्म सांगतात, नवरा-बायको एकाच ताटात जेवल्याने नवऱ्याचं बायकोवरचं प्रेम वाढतं. पण तो व्यक्ती घरातल्या इतर मंडळींकडे दुर्लक्ष करू शकतो. यामुळे घरात भांडण होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंब आणि घरातला आनंद दूर होऊ शकतो हे देखील भीष्म पितामह यांनी सांगितलं आहे.
चूक आणि बरोबरमधला फरक कळत नाही
बायकोच्या प्रति अती प्रेम असणं म्हणजे बुद्धी भ्रष्ट होण्यासारखं असून व्यक्तीला चूक आणि बरोबर काय यामधला फरक कळत नाही. ही गोष्ट घरातल्या मंडळींना न पटण्यासारखी आहे. यामुळेच नवरा-बायकोने एकाच ताटात जेवू नये.
पण कुटुंबाने एकत्र जेवल्यास कुटुंबात एकता आणि प्रेम वाढतं. याशिवाय एकमेकांसोबतचे नातेसंबंध घट्ट होतात. एकमेकांच्या प्रति आदराची भावनाही वाढते. यामुळे घरात सुखसमृद्धी येते.
जेवताना ही चूक घडणे म्हणजे…
भीष्म पितामह यांनी हे देखील सांगितलंय की, एखाद्याने तुम्ही वाढलेले जेवणाचे ताट ओलांडल्यास ताटातलं जेवण मातीसारखं दूषित मानलं जातं. हे जेवण जनावरांना द्यावं. याशिवाय एखाद्याचा पाय जेवणाच्या ताटावर पडल्यास त्या ताटाला नमस्कार करून ते जेवण फेकून द्यावं. हे जेवण घरात दारिद्र्य आणतं. तसंच जेवणात केस आढळल्यास ते जेवणही खाऊ नये. यामुळे घरातल्या धनाची हानी होते.