शंभर वर्ष निरोगी आयुष्य जगाचंय?, फक्त रोज सकाळी पाळा हे पाच नियम
आयुर्वेदानुसार दिवसाची सुरुवात केल्यास शरीर, मन आणि आत्मा संतुलित राहतात. सकाळी उठल्यावर विषारी घटक बाहेर टाकणे, जीभ स्वच्छ करणे, डोक्याला तेल लावणे, व्यायाम करणे आणि ध्यान करणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
- FB
- TW
- Linkdin
Follow Us
)
दिवसाची सुरुवात आयुर्वेदानुसार का करावी?
आयुर्वेद म्हणजे नुसता उपचार नव्हे, तर आयुष्य जगण्याची पद्धत आहे. सकाळची वेळ ही शरीर, मन आणि आत्म्याला संतुलित ठेवण्याची सुवर्णसंधी असते. जर तुम्ही दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीनं केली, तर तुमचा संपूर्ण दिवस सकारात्मक ऊर्जा, चांगलं आरोग्य आणि मानसिक शांतीनं भरलेला जाईल. चला जाणून घेऊया त्या ५ आयुर्वेदिक नियमांबद्दल...
विषारी घटक बाहेर टाका, दिवसाची पहिली प्रक्रिया
सकाळी उठल्यानंतर प्रथम शरीरात साचलेली विषारी द्रव्यं बाहेर टाकणं अत्यंत आवश्यक असतं. यासाठी प्रथम ब्रश करा, मग एक ग्लास कोमट पाणी प्या – हे आतड्यांच्या हालचालींना चालना देतं. रोज ठरलेल्या वेळेला शौचाला जाणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. यामुळे संपूर्ण पचनसंस्थेचं आरोग्य टिकून राहतं.
जीभ स्वच्छ करा, पचनसंस्थेचा आरंभ इथूनच!
आयुर्वेदानुसार जीभ ही आरोग्याचा आरसा आहे. झोपेत असताना जीभेवर जमा होणाऱ्या टॉक्सिन्स (अमा) रोज सकाळी साफ करणं महत्त्वाचं आहे. यामुळे केवळ श्वास ताजा राहत नाही, तर आतड्यांशी संबंधित अवयवही संतुलित राहतात. जीभ स्वच्छ करणं ही साधी पण अत्यंत शक्तिशाली आरोग्यवर्धक सवय आहे.
डोक्याची तेलाने मालिश, मेंदूसाठी अमृतसारखी
सकाळी गरम तेलाने डोक्याची हलकी मालिश केल्याने मेंदूचं रक्तप्रवाह सुधारतो, चिंता आणि ताण कमी होतो. केस गळती, टक्कल, डोकेदुखी यांसारख्या समस्यांपासून बचाव होतो. आयुर्वेदात या प्रकाराला 'शिराभ्यंग' म्हणतात. दररोज नाही जमलं, तरी आठवड्यातून २-३ वेळा जरूर करा.
व्यायाम आणि सूर्यनमस्कार, शरीराला ऊर्जा मिळवा
आयुर्वेदानुसार सकाळी हलकाफुलका व्यायाम, विशेषतः सूर्यनमस्कार केल्याने शरीरातील प्रत्येक स्नायू सक्रिय होतो. त्यामुळे पचन सुधारतं, रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि मानसिक स्थैर्य येतं. सूर्यनमस्कार हे एक संपूर्ण व्यायाम आहे, जे संपूर्ण आरोग्य टिकवून ठेवतं.
प्राणायाम व ध्यान, मनाला शांतता आणि स्थैर्य
सकाळची शांत वेळ ही ध्यान आणि प्राणायामासाठी सर्वोत्तम असते. काही मिनिटं खोल श्वास घेणं आणि ध्यान करणं, यामुळे मनातील तणाव निघून जातो. सकारात्मक विचार वाढतात आणि आत्मिक शांती मिळते. प्राणायामामुळे फुफ्फुसांची ताकद वाढते आणि श्वसनाशी संबंधित त्रास कमी होतात.
या ५ नियमांमुळे आयुष्य होईल निरोगी आणि आनंदी!
हे नियम फारसे कठीण नाहीत पण रोज सराव केल्यास तुमचं आयुष्य आरोग्यदायी, सकारात्मक आणि दीर्घायुषी होऊ शकतं. आयुर्वेद सांगतो, "नित्याचं पालन हेच आरोग्याचं गमक आहे." त्यामुळे उद्यापासून या नियमांप्रमाणे दिवसाची सुरुवात करा आणि अनुभवा तुमच्या जीवनात होणारा चमत्कार!