महाराष्ट्रातील शेतकरी : बियाणे आणि खते खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? जाणून घेऊया सविस्तर माहिती…
खते खरेदीचे टिप्स: शेती क्षेत्राचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा पुरवठा वेळेत होण्यासाठीही प्रयत्न केला जातो. कारण बियाणे उत्तम दर्जाचे असल्याने शेती उत्पादनात २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होणे शक्य असते. खतांमुळेही पिकांना पुरेशा प्रमाणात पोषणतत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते. तसेच किटकनाशकांमुळे पिकांचे संरक्षण होते.
पण कधीकधी योग्य माहितीच उपलब्ध नसल्याने किंवा योग्य माहितीचे ज्ञान नसल्याने शेतकऱ्यांकडून खते-बियाणे खरेदी करताना चूक होऊ शकते. पण बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना आणि फवारणी करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया सविस्तर माहिती…
शेतकऱ्यांनो या गोष्टी लक्षात ठेवा
- गुणवत्ता आणि दर्जाची हमी देणाऱ्या विक्रेत्यांकडूनच बियाणे-खते खरेदी करा
- खरेदी पावतीवर बियाण्यांची, खतांची संपूर्ण माहिती नमूद केली आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. उदाहरणार्थ - पीक, लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, खरेदी करणाऱ्याचे नाव- पत्ता, विक्रेत्याचे नाव इत्यादी
- विकत घेतलेल्या बियाण्याचे वेष्टन पिशवी, टॅग, खरेदी पावती आणि त्यातील थोडे बियाणे, खते या सर्व गोष्टी पिकांची कापणी पूर्ण होईपर्यंत जपून ठेवाव्यात.
- बियाण्यांची, खतांची पाकीटे सिलबंद असल्याची खात्री करून घ्यावी.
- पाकिटांवरील अंतिम मुदत (Expiry Date) तपासून घ्या
- फवारणीवेळी या गोष्टींचे काटेकोरपणे करा पालन
- पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना तुमच्या शरीरास कोणताही अपाय होणार नाही, असे कपडे वापरावेत.
- कीटकनाशकांचा वास घेणे टाळावे
- फवारणी प्रक्रियेपासून लहान मुले, जनावरे, पाळीव प्राण्यांना दूर ठेवावे
- कीटकनाशकांच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या तातडीने नष्ट करा
- कीटकनाशक फवारण्याची प्रक्रिया दर दिवशी आठ तासांपेक्षा अधिक वेळ नसावी
- कडक उन्हात, वादळीवारे, पावसात आणि पाऊस पडल्यानंतर लगेचच फवारणी करू नये.