ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात घबराटीचे वातावरण आहे. त्यामुळे भारतात सुरक्षा वाढवण्यात आली आहे, पंजाब आणि बंगालमध्ये सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली - ऑपरेशन सिंदूरनंतर घाबरलेल्या पाकिस्तानच्या हालचालींमुळे जम्मू-काश्मीरपासून राजस्थानपर्यंत विशेष दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे पंजाब सरकारने सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत आणि त्यांना परवानगीशिवाय ड्युटी स्टेशन सोडण्यास मनाई केली आहे. याशिवाय दिल्लीत सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच आता डॉक्टरांच्याही सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पंजाब आणि बंगाल सरकारने सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
बंगाल सरकारनेही आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोनद्वारे होणारी तस्करी रोखण्यासाठी अत्याधुनिक अँटी-ड्रोन सिस्टिम खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकार ५३२ किलोमीटर लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर असे ९ अँटी-ड्रोन सिस्टिम बसवणार आहे.
शाळा-कॉलेज शनिवारपर्यंत बंद
यासोबतच सरकारने युद्ध किंवा दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांनाही फरिश्ते योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याअंतर्गत जखमींवर पूर्णपणे मोफत उपचार केले जातील. जम्मू-काश्मीर, पंजाब आणि चंदीगडमध्ये गुरुवारीच सर्व शाळा-कॉलेज शनिवारपर्यंत बंद राहतील अशी घोषणा करण्यात आली होती. अमृतसरची गुरु नानक देव विद्यापीठ आणि जालंधरचे एनआयटी १६ मे पर्यंत बंद राहणार आहे.
काही खाजगी विद्यापीठांनी ११ मेपर्यंत सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने विद्यार्थ्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे. जालंधर पोलिसांनी सर्व खाजगी संस्थांनाही बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
२० किलोमीटरपर्यंतच्या गावांमध्ये शुकशुकाट
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ २० किलोमीटरच्या आत येणाऱ्या गावांना रिकामे करण्यात आले आहे. सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधिकारी सतत बैठका घेत आहेत जेणेकरून कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवता येईल. जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालांनी लोकांना कोणत्याही महत्त्वाच्या कारणाशिवाय रस्त्यावर न येण्याचे आवाहन केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत सर्व शाळा, कॉलेज आणि विद्यापीठेही बंद राहतील.