जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यावर रॉबर्ट वाड्रा यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून, हिंदू-मुस्लिमांमध्ये दरी निर्माण झाल्याचा आरोप केला आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारत हादरून गेला आहे. या भीषण हल्ल्यात आतापर्यंत २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, अनेक देशांनी भारताला या संकटसमयी पाठिंबा दर्शवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत आणि परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

दरम्यान, या हल्ल्यावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी केंद्र सरकारवर टीका करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, “आपल्या देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दरी निर्माण झाली आहे. मुस्लिमांना असुरक्षित आणि कमकुवत वाटतंय,” असं मत त्यांनी मांडलं.

मोदी सरकार हिंदुत्वाबाबत…

रॉबर्ट वाड्रा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, “या हल्ल्यामुळे मला खूप दुःख झालं आहे. हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. आजचं सरकार हिंदुत्वावर बोलतं, ज्यामुळे अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटतं. हल्ल्याची पद्धत पाहिली तर लक्षात येईल की दहशतवाद्यांनी लोकांची ओळख पटवून हल्ले केले. ते असं का करत असतील? कारण आपल्या देशात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात फूट पाडली गेली आहे.”

…हा तर नरेंद्र मोदींना संदेश

रॉबर्ट वाड्रा पुढे म्हणाले, “हिंदू-मुस्लिमांमध्ये वाढलेली दरी पाहूनच दहशतवादी संघटनांना वाटतं की भारतात मुस्लिमांना त्रास दिला जातोय. त्यामुळेच त्यांनी लोकांची ओळख तपासून त्यांच्यावर हल्ला केला. अशा प्रकारच्या कृत्यांद्वारे त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना संदेश दिला आहे. देशात आपण सुरक्षित आणि धर्मनिरपेक्ष आहोत, हे दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. जर असं घडलं, तर पहलगामप्रमाणे इतर घटनांचा पुनरावृत्ती होणार नाही,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश

हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. पहलगाममध्ये ठिकठिकाणी सैन्य तैनात करण्यात आलं आहे. हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून, काही पर्यटक गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे.