पाकिस्तानच्या विश्वासघातकी धोरणाचे दर्शन पुन्हा एकदा घडले. युद्धविराम जाहीर झाल्यानंतर अवघ्या चार तासांतच पाकिस्तानने तो मोडला. त्यामुळे युद्धविराम पाकिस्तानी लष्कराला मान्य आहे, की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान यांच्यात सलग 86 तास चाललेले युद्ध शनिवारी सायंकाळी 5 वाजता अधिकृतपणे संपले आणि दोन्ही देशांनी युद्धविरामावर सहमती दर्शवली. मात्र, पाकिस्तानच्या विश्वासघातकी धोरणाचे दर्शन पुन्हा एकदा घडले. युद्धविराम जाहीर झाल्यानंतर अवघ्या चार तासांतच पाकिस्तानने तो मोडला असे वृत्त आहे. जम्मू आणि काश्मिर, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये आकाशात पाकिस्तानी लष्कराचे अनेक ड्रोन दिसत आहेत. त्यामुळे येथील काही शहरांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांमधील पाकिस्तानचा हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला असल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, काही वेळापूर्वी ड्रोन हल्ले थांबवण्यात आले होते. त्यामुळे काही काळ परिसरात शांतता पसरली. परंतु, पुन्हा हल्ले होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. पाकिस्तानकडून सुमारे ११ ठिकाणी युद्धविरामाचे उल्लंघन करण्यात आले. तर सुमारे २०० पेक्षा जास्त ड्रोन हल्ले केल्याचे समजते.
गेल्या काही तासांत जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींना पुन्हा उधाण आले आहे. शनिवारी रात्री पाकिस्तानने अखनूर, राजौरी आणि आरएस पुरा या सीमावर्ती भागांत तोफ गोळ्यांद्वारे जोरदार मारा केला आहे. या आक्रमक कारवायांमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात एक संशयित ड्रोन स्फोट झाला. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, बीएसएफच्या जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे परिसरात पुन्हा तोफगोळे आणि गोळीबाराचे मोठमोठे आवाज येत आहेत. भारतीय एअर डिफेन्स सिस्टिम पुन्हा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून सुरु असलेल्या ड्रोन हल्ल्यांना परतावून लावले जात आहे. श्रीनगरजवळ पाकिस्तानचे काही ड्रोन नष्ट केल्याचे वृत्त आहे. गुलमर्गमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याचे वृत्त आहे.
राजस्थानच्या बाडमेर आणि गुजरातमधील कच्छ परिसरातही ड्रोनने हल्ला करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे भारतीय लष्कर सतर्क झाले असून ड्रोन पाडण्यात येत आहेत. पाकिस्तानने ड्रोन हल्ला केलेल्या शहरांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन पुन्हा सतर्क झाले असून आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत.
पालनवाला सेक्टरमध्येही युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आल्याचे समोर आले आहे. भारताच्या लष्कराने या सर्व प्रक्षोभक कारवायांवर तत्काळ आणि कठोर प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहे. सुरक्षादलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सीमाभागांत गस्त आणि देखरेख वाढवण्यात आली आहे.
ही घटना पाकिस्तानच्या नेहमीच्या कपटी धोरणाचे प्रत्यक्ष उदाहरण असून, शांततेच्या कोणत्याही प्रस्तावावर तो किती विश्वासघात करू शकतो, याचे स्पष्ट निदर्शक आहे. तसेच पाकिस्तानी सरकारने युद्धविराम केला असल्याने तो पाकिस्तानी लष्कराला किती मान्य आहे, हे येत्या काही दिवसांमध्ये बघण्यासारखे असेल.