जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांचा फोटो सुरक्षा यंत्रणांनी प्रसिद्ध केला आहे. या हल्ल्यात किमान २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांचा फोटो सुरक्षा यंत्रणांनी प्रसिद्ध केला आहे. या हल्ल्यात किमान २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यात सहा जण महाराष्ट्रातील आहेत. वृत्तानुसार, हे सर्व दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी (LeT) संबंधित आहेत आणि त्यापैकी किमान दोघे परदेशी असल्याचे मानले जात आहे.
पाकिस्तानस्थित आणि बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा (LeT) दहशतवादी संघटनेच्या एका गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. परंतु सरकारकडून याची पुष्टी झालेली नाही.
आज सकाळी, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून, पहलगाम हल्ल्यामागील किमान तीन दहशतवाद्यांची रेखाचित्रे सुरक्षा यंत्रणांनी प्रसिद्ध केले.
२०१९ मध्ये कलम ३७० रद्द झाल्यापासूनचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे, ज्यात मंगळवारी किमान २६ पर्यटक ठार झाले आणि अनेक जखमी झाले. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या पहलगाम हिल स्टेशनपासून सुमारे ७ किमी अंतरावर असलेल्या बैसरन मैदानावर हा हल्ला झाला.
या हल्ल्यात बचावलेल्या नागरिकांनी सांगितले, की लष्कराच्या गणवेशात असलेल्या दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारावर त्यांना लक्ष्य केले. हल्लेखोरांनी गोळीबार करण्यापूर्वी नागरिकांना इस्लामी ओळी म्हणायला लावल्या.
दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला, जेव्हा पर्यटक बर्फाच्छादित पर्वत आणि देवदार वृक्षांनी वेढलेल्या निसर्गरम्य मैदानात विश्रांती घेत होते. या भागात जवानांच्या अनेक चौक्या आणि सशस्त्र गस्त असतानाही, हल्लेखोरांनी पर्यटन स्थळावर हाहाकार माजवला.
पंतप्रधान मोदी यांनी सौदी अरेबिया दौरा आटोपता घेतला
पहलगाम दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात होते. ते तातडीने दिल्लीला परतले आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना फोनवरुन माहिती दिली. पंतप्रधानांनी हल्ल्याचा निषेध करत हत्याकांडात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही असे सांगितले.
"मी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. आपले प्रियजन गमावलेल्यांप्रती संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. जखमींना सर्वतोपरी मदत दिली जात आहे," असे पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले.
ते म्हणाले, “या घृणास्पद कृत्यामागील लोकांना शिक्षा होईल... त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचे कारस्थान कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवाद्यांशी लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल.”
दिल्लीला परतल्यानंतर, पंतप्रधान मोदी यांनी विमानतळावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबत तात्काळ बैठक घेतली.
आज सायंकाळी ६ वाजता सुरक्षेसंदर्भातील कॅबिनेट समितीची (CCS) बैठक होणार आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी श्रीनगरमधील पोलीस नियंत्रण कक्षात पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.