एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तान तसेच त्याच्या पाठीराख्या चीनवर जोरदार टीका केली आहे.
नवी दिल्ली - भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाच्या वातावरणात एक मोठी घटना समोर आली आहे. भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान येथील एअरबेसवर लष्करी हवाई हल्ला केला, ज्यामुळे त्या एअरबेसवरील एकमेव धावपट्टी उद्ध्वस्त झाली असून ती पुढील आठवडाभरासाठी बंद ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तान तसेच त्याच्या पाठीराख्या चीनवर जोरदार टीका केली आहे.
रहीम यार खान एअरबेस बंद – भारताच्या हल्ल्याचा परिणाम
पाकिस्तान नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (CAA) १० मेपासून १८ मेपर्यंत रहीम यार खान एअरबेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत नोटम (NOTAM) म्हणजेच ‘नोटीस टू एअरमेन’ जारी करण्यात आली आहे. या नोटममध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, “धावपट्टी दुरुस्तीच्या कामामुळे ऑपरेशन्स बंद असतील.”
भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यात धावपट्टीचे मोठे नुकसान झाल्याने एअरबेसवर लष्करी हालचाली सध्या थांबवण्यात आल्या आहेत. पाकिस्तानकडून याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नसला तरी आंतरराष्ट्रीय सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.
ओवैसींची कडक टीका – पाकिस्तान व चीनवर उपरोधिक टोला
या घटनेनंतर असदुद्दीन ओवैसी यांनी एक्स (माजी ट्विटर) वरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांना उद्देशून लिहिले, “पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भाड्याने घेतलेली चिनी विमाने ते अजूनही रहीम यार खान एअरबेसवर उतरवू शकतील का?”
या उपहासात्मक टिप्पणीमध्ये ओवैसी यांनी चीनवरही निशाणा साधला आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे चीनच्या पाकिस्तानला मिळणाऱ्या मदतीचा आणि त्याच्या तथाकथित सामरिक पाठिंब्याचा समाचार घेतला.
ऑपरेशन सिंदूरनंतर वाढलेला संघर्ष
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचे प्रयत्न केले. मात्र भारतीय लष्कराने सर्व आक्रमणांना वेळेवर आणि ठाम प्रत्युत्तर दिले. या घटनांमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव अधिक वाढला आहे.
याच काळात चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी १० मे रोजी स्पष्टपणे सांगितले की, “पाकिस्तानच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी चीन त्यांच्या बाजूने उभा राहील.” हा चीनचा पाठिंबा भारतासाठी चिंता निर्माण करणारा आहे.
स्थिर शांतता कधी शक्य? – ओवैसी यांचा इशारा
ओवैसी यांनी याआधीही पाकिस्तानच्या भूमीवरून भारतविरोधी दहशतवादी कारवाया होणं थांबवणं गरजेचं असल्याचं ठामपणे मांडलं आहे.
त्यांनी म्हटलं होतं…
“जोपर्यंत पाकिस्तान भारताविरोधात दहशतवादासाठी त्यांची भूमी वापरू देत आहे, तोपर्यंत स्थिर शांतता शक्य नाही. शस्त्रविराम होवो किंवा न होवो, आपण पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार दहशतवाद्यांचा पाठलाग करणे थांबवू नये.”
भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढत असून लष्करी हालचालींना गती मिळत आहे. रहीम यार खान एअरबेसवरील हल्ला ही भारताकडून स्पष्ट संदेश आहे की दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तींना उत्तर देण्यासाठी भारत सज्ज आहे. ओवैसींच्या टिप्पणीने या विषयाला राजकीय परिमाणही मिळाले असून चीनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.