परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे, की आता पाकिस्तानसोबत केवळ आणि केवळ पीओके आणि दहशतवादावर चर्चा होईल. इतर कोणतेही मुद्दे चर्चेत येणार नाहीत.
नवी दिल्ली - पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी केंद्रांवर लक्ष्य करून कठोर सैनिकी कारवाई केली. या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पाकिस्तानविषयी भारताची भूमिका स्पष्ट करत एक ठाम संदेश दिला आहे. "पाकिस्तानशी चर्चा होणारच असेल, तर ती फक्त पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (PoK) व दहशतवादावरच होईल. यापलीकडे इतर कोणत्याही मुद्यावर संवाद होणार नाही."
डॉ. जयशंकर हे दिल्लीत होंडुरासच्या दूतावासाच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानबरोबर कोणत्याही चर्चेत तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप भारताला मान्य नसल्याचे स्पष्ट केले.
भारताची धोरणात्मक स्पष्टता: द्विपक्षीय संबंध व देशहित
"पाकिस्तानशी आमचे संबंध हे पूर्णपणे द्विपक्षीय राहतील. हे भारतात अनेक वर्षांपासून असलेले राष्ट्रीय एकमत आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही," असे जयशंकर म्हणाले.
त्यांनी ‘सिंधू जल करार’ या बाबतीतही स्पष्ट भूमिका मांडली. “हा करार सध्या स्थगित आहे. तो पुढे जाईल की नाही हे पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांवर अवलंबून असेल. जोपर्यंत दहशतवाद थांबत नाही, तोपर्यंत करार स्थगितच राहील.”
फक्त एकच गोष्ट चर्चेसाठी उरली आहे, पाकव्याप्त काश्मीर
जयशंकर यांनी पुढे सांगितले की, “काश्मीरवर चर्चा करण्यासाठी एकमेव मुद्दा उरतो – तो म्हणजे पाकिस्तानने अनधिकृतरित्या व्यापलेला काश्मीरमधील भारताचा भूभाग ताब्यातून मुक्त करणे. भारत त्या चर्चेसाठी नेहमीच तयार आहे.”
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानला स्पष्ट संदेश
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील आणि पीओकेमधील दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. यात बहावलपूर (जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला) आणि मुरिदके (लष्कर-ए-तोयबा केंद्र) अशा महत्त्वाच्या दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले.
जयशंकर यांनी सांगितले, “या कारवाईत आम्ही अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली. पाकिस्तानला आधीच कळवले होते की हल्ला त्यांच्या लष्करावर नव्हे तर दहशतवादी तळांवर होणार आहे. त्यांनी हस्तक्षेप न करण्याचा पर्याय निवडू शकला असता, पण त्यांनी तो नाकारला आणि परिणामी १० मे रोजी त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला.”
त्यांनी उपग्रह छायाचित्रांचा हवाला देत सांगितले की, भारताने केलेले नुकसान आणि पाकिस्तानने सहन केलेले नुकसान यातील फरक अगदी स्पष्ट आहे. यावरून कुणाला शस्त्रविराम हवा होता, हेही समजते.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या या विधानाने भारताची पाकिस्तानविषयी धोरणात्मक भूमिका अधिक बळकट झाली आहे. दहशतवादाचा पाय मोडून टाकण्यासाठी आणि पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारताच्या ताब्यात आणण्यासाठी भारत आता अधिक सक्रिय व आक्रमक भूमिका घेत आहे. हे वक्तव्य भारताच्या नवीन संरक्षण धोरणाचे स्पष्ट संकेत देत आहे.