पाकिस्तानने चिनी बनावटीच्या PL-15 क्षेपणास्त्राचा वापर करून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अयशस्वी ठरले. भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत केलेले हल्ले मात्र अचूक ठरले, तर चीनची HQ-9B हवाई संरक्षण प्रणालीही निष्प्रभ ठरली.
नवी दिल्ली - प्रतिनिधी भारत-पाकिस्तान सीमावादाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भारत 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे अचूक लष्करी क्षमता दाखवत असताना, दुसरीकडे पाकिस्तान आणि त्याचा 'लोखंडी मित्र' चीन मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर उपहासाचे धनी ठरत आहेत.
गुरुवारी रात्री, पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतीय हद्दीत चिनी बनावटीच्या PL-15 लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा वापर करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘अचूकतेच्या’ गाजावाजामागे लपलेले हे शस्त्र थेट पंजाबमधील होशियारपूरजवळील एका शेतात कोसळले – कोणतीही हानी न करता, आणि कोणतीही स्पष्टीकरण देण्याची शक्यता न ठेवता. याचवेळी, चीनने पाकिस्तानला पुरवलेली HQ-9B हवाई संरक्षण प्रणालीही भारताच्या हल्ल्यांमध्ये निष्क्रिय झाली. दोन दिवसांत दोन चिनी शस्त्रं – एक जमिनीवर निष्प्रभ, दुसरं हवेत अकार्यक्षम!
"सर्व हवामान मैत्री" पण शस्त्रं कोणत्याही हवामानात फेल!
चीन-पाकिस्तान युतीला ‘All-weather friendship’ असं म्हटलं जातं. मात्र, त्यांच्या शस्त्रास्त्रांची कामगिरी पाहता, ही दोस्ती फक्त शोभेची – प्रॉपसारखी – वाटू लागली आहे. PL-15 क्षेपणास्त्र अपयशी ठरलं, HQ-9B प्रणाली निष्प्रभ ठरली – आणि यामुळे पाकिस्तानच्या 'हल्ला परतावा' मोहिमेला फसवणूक ठरली.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय लष्कराने बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि पीओकेतील नऊ दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करत जगासमोर लष्करी प्रभुत्व सिद्ध केलं.
भारताचं अचूक लक्ष्य vs पाकिस्तानचं अपयशी प्रयोग संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की भारतावरील कोणत्याही हल्ल्याला “योग्य आणि प्रभावी प्रत्युत्तर” दिलं जाईल. हे प्रत्युत्तर केवळ लष्करी नव्हे, तर तांत्रिक पातळीवरही उच्च प्रतीचं आहे – जे आज पाकिस्तानला आणि त्याच्या पुरवठादार चीनला स्पष्टपणे समजलं आहे.