सार

या कारवाईत पाकिस्तानच्या सहा लढाऊ विमानांसह दोन उच्च-मूल्य गुप्तचर विमाने, एक ‘C-130’ मालवाहू विमान, ३० पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे आणि अनेक मानवविरहित विमानांचा (UAV) नाश करण्यात आला.

नवी दिल्ली - भारतीय वायुदलाने (IAF) गेल्या महिन्यात पाकिस्तानविरोधात चार दिवस चाललेल्या संघर्षात त्यांच्या हवाई सामर्थ्याला जबरदस्त फटकारा दिला आहे. या कारवाईत पाकिस्तानच्या सहा लढाऊ विमानांसह दोन उच्च-मूल्य गुप्तचर विमाने, एक ‘C-130’ मालवाहू विमान, ३० पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे आणि अनेक मानवविरहित विमानांचा (UAV) नाश करण्यात आला, अशी माहिती या मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या वरिष्ठ सूत्रांनी पहिल्यांदाच दिली आहे.

ही व्यापक हवाई मोहीम ‘ऑपरेशन सिंदूर’चा भाग होती, ज्याची सुरुवात ६-७ मेच्या रात्री पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर प्रतिहल्ल्यांद्वारे झाली. १० मेपर्यंत चाललेल्या या संघर्षाचा शेवट पाकिस्तानकडून युद्धविरामाची विनंती आल्यानंतर झाला.

सूत्रांच्या माहितीनुसार, “ऑपरेशनल डेटा आणि तांत्रिक विश्लेषणावरून हे सिद्ध झाले आहे की पाकिस्तानच्या हवाई दलाची सहा लढाऊ विमाने हवाई संघर्षादरम्यान पाडण्यात आली.” यातील एक गुप्तचर विमान, जे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर अथवा एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल (AEW&C) प्रकारचे होते, ते ‘सुदर्शन’ या क्षेपणास्त्राने जवळपास ३०० किलोमीटर अंतरावरून पाडले गेले. स्वीडन-निर्मित आणखी एक AEW&C विमान भोलारी हवाई तळावरील क्रूझ क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आले.

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोलारी तळावर हल्ल्याच्या वेळी हॅंगरमध्ये लढाऊ विमाने ठेवली होती. तिही नष्ट करण्यात आली. मात्र पाकिस्तानने अजूनही हल्ल्याग्रस्त परिसरातील ढिगारा हटवलेला नसल्यामुळे ही हानी अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाही.

भारतीय क्षेपणास्त्र आणि रडार प्रणालींनी दिलेल्या दृश्य पुराव्यानुसार, या हल्ल्यानंतर पाकिस्तानची लढाऊ विमाने रडारवरून अचानक अदृश्य झाली होती. याशिवाय, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात करण्यात आलेल्या एका ड्रोन हल्ल्यात ‘C-130’ मालवाहू विमान देखील पाडण्यात आले.

या हवाई मोहिमेत भारताने प्रामुख्याने हवेतून प्रक्षेपित होणाऱ्या क्रूझ आणि ब्रम्होस क्षेपणास्त्रांचा वापर केला. जमिनीवरून प्रक्षेपित ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा उपयोग मात्र करण्यात आला नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

राफेल आणि सुखोई-३० या भारतीय लढाऊ विमानांनी केलेल्या संयुक्त हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या एका महत्त्वाच्या हॅंगरवर निशाणा साधण्यात आला. येथे चीनमधून आयात करण्यात आलेल्या Wing Loong प्रकारच्या मानवविरहित ड्रोनची मोठी तुकडी नष्ट करण्यात आली. हे मध्यम उंचीवर दीर्घकाळ उड्डाण करणारे ड्रोन पाकिस्तानच्या आक्रमक हवाई ताफ्याचा भाग होते.

या व्यतिरिक्त, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी पाकिस्तानच्या १० पेक्षा जास्त आक्रमक मानवरहित विमाने (UCAVs) खाली पाडली. तसेच, भारतातील विविध हवाई तळांवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानकडून प्रक्षेपित करण्यात आलेली अनेक क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रेदेखील रोखण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संघर्षादरम्यान संकलित करण्यात आलेल्या व्यापक डेटा विश्लेषणाचे काम अजूनही सुरू आहे. या मोहिमेद्वारे भारताने केवळ पाकिस्तानच्या हवाई ताकदीवरच गंभीर आघात केला नसून, भविष्यातील सुरक्षा धोरणांसाठीही महत्वाची माहिती गोळा केली आहे.