सार

केरळमधील एक आध्यात्मिक विचारवंत आणि लेखक डॉ. आर. रमणंद यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील १०० स्वयंस्फूर्त रायडर्सनी 'बुलेट्स अगेन्स्ट बुलेट्स' या अनोख्या मोहिमेचा प्रारंभ केला आहे.

कलडी, केरळ - पहुतेक वेळी दहशतवादाविरोधात निषेध मोर्चे, निवेदने, राजकीय भाषणे अशा पारंपरिक मार्गांनी व्यक्त होतो. पण या साऱ्याच्या पलीकडे जाऊन केरळमधील एक आध्यात्मिक विचारवंत आणि लेखक डॉ. आर. रमणंद यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील १०० स्वयंस्फूर्त रायडर्सनी 'बुलेट्स अगेन्स्ट बुलेट्स' या अनोख्या मोहिमेचा प्रारंभ केला आहे. केरळच्या कलडी येथून काश्मीरमधील शारदा मंदिरापर्यंतचा हा ३,६०० किलोमीटरचा प्रवास १ जून रोजी प्रारंभ झाला आहे.

ही यात्रा केवळ एका मार्गक्रमणाची नाही, तर एका राष्ट्रीय, आध्यात्मिक आणि प्रतीकात्मक अभिव्यक्तीची आहे—देशातील वाढत्या दहशतवादी घटनांविरोधातील शांततामूलक पण ठाम उत्तर.

दहशतीला शांततेचं 'बुलेट' उत्तर २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हेलावून गेला. डॉ. रमणंद या हल्ल्याच्या अवघ्या दोन आठवडे आधी काश्मीरमध्ये होते. त्या घटनेनंतर त्यांना काहीतरी ठोस करायचे होते. परिणामी, ‘बुलेट्स अगेन्स्ट बुलेट्स’ या संकल्पनेचा जन्म झाला. यामध्ये 'बुलेट' म्हणजे गोंगाट करणारी बंदूक नव्हे, तर हार्ले डेव्हिडसन, रॉयल एनफिल्डसारख्या दुचाकी!

दहशतीच्या गोळ्यांना (bullets) भारताचे प्रेम, निष्ठा आणि बुलेट दुचाकींनी दिलेले उत्तर ही या मोहिमेची आधारशिला आहे.

‘चलो एलओसी’: एक देशप्रेमी चळवळ ‘चलो एलओसी’ नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून या मोहिमेचे आयोजन झाले. काही दिवसांतच हजारो देशप्रेमींनी या उपक्रमाला पाठिंबा दिला. यात तरुण, महिला, वृद्ध, शेतकरी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विद्यार्थी, तृतीयपंथीय प्रतिनिधी अशा विविध समाजघटकांचा सहभाग आहे. १०० जणांची निवड अंतिम प्रवासासाठी झाली असून त्यामध्ये १५ महिला असून वय २० ते ६५ वर्षांदरम्यान आहे.

विशेष म्हणजे, या प्रवासाचा अंदाजे खर्च प्रतिजण ₹६०,००० असूनही कोणताही सहभागी यासाठी निधी मागत नाही. ही फंडरेझर मोहिम नसून शुद्ध राष्ट्रनिष्ठेचा एक साक्षात्कार आहे.

राजकीय आणि नैतिक पाठिंबा डॉ. रमणंद यांनी भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर तसेच राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याशी या उपक्रमाबाबत चर्चा केली. दोघांनीही या मोहिमेचे कौतुक केले असून आवश्यकतेनुसार पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. खुद्द चंद्रशेखर यांनी या प्रवासात काही टप्प्यावर सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

‘भारताच्या सुषुम्नामार्गाने’ एक आध्यात्मिक प्रवास डॉ. रमणंद या मोहिमेकडे केवळ भौगोलिक प्रवास म्हणून न पाहता, संपूर्ण भारताच्या ‘सुषुम्ना’ अर्थात मेरुदंडातून होणाऱ्या एका आध्यात्मिक यात्रेप्रमाणे पाहतात. कलडी—जे आदि शंकराचार्यांचे जन्मस्थान आहे—तेथे सुरुवात होणारा हा प्रवास भारताच्या अंतःकरणातून होतो आहे. हा प्रवास केवळ रस्त्यांवरून नसून, भारतीय संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रभावनेच्या धाग्यांनी बांधलेला आहे.

१२ दिवस, ३६०० किमी, एक निर्धार १ जून ते १२ जूनदरम्यान १०० रायडर्स भारताच्या अनेक राज्यांतून प्रवास करत काश्मीरच्या टीटवाल येथील शारदा मंदिर गाठणार आहेत. ही यात्रा केवळ शाररिक अथवा यांत्रिक नाही, तर एका वैचारिक चळवळीचा भाग आहे. संघटनेच्या आघाडीवर मणी कार्तिक (अध्यक्ष), सुखन्या कृष्णा (सचिव) आणि सुमेश (खजिनदार) यांच्यावर नेतृत्वाची जबाबदारी आहे.

एक शांततामूलक इशारा ‘बुलेट्स अगेन्स्ट बुलेट्स’ ही मोहीम भारताच्या आधुनिक नागरिकांकडून दिले गेलेले एक सकस, शांत आणि सशक्त उत्तर आहे. दहशतीला बंदुका न वापरता, परंतु शौर्य आणि सुसंस्काराने उतर देणाऱ्या या प्रवासाचे देशभरात कौतुक होत आहे.

"देशविरोधी शक्तींना बंदुकीने नाही, तर संस्कारांनी आणि राष्ट्रनिष्ठेने उत्तर दिलं पाहिजे", असा संदेश घेऊन ही मूक परंतु गगनभेदी यात्रा देशाच्या एकात्मतेचा झेंडा घेऊन पुढे सरसावत आहे.