डॉ. उमर अहमद इलियासी यांनी आतंकवादाविरुद्ध कडक फतवा जारी करत म्हटले आहे की, भारतात मारल्या गेलेल्या आतंकवाद्यांची नमाज-ए-जनाजाही वाचली जाणार नाही आणि त्यांना देशाच्या मातीतही पुरले जाणार नाही.
नवी दिल्ली - २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात २५ भारतीय नागरिक आणि एक नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आणि भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी अड्ड्यांवर निर्णायक कारवाई केली आहे. देश एकजुटीने दहशतवादाविरुद्ध उभा आहे. या एकजुटीच्या पार्श्वभूमीवर इमामांच्या संघटनेने मोठी घोषणा केली आहे.
ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. उमर अहमद इलियासी यांनी एक कडक आणि ऐतिहासिक फतवा जारी करून दहशतवादाविरुद्ध इस्लामिक दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. त्यांनी दहशतवाद्यांच्या जनाज्यावर नमाज वाचण्यास मनाई करण्यासोबतच कबर देण्याविरुद्धही फतवा जारी केला आहे.
जनाज्याच्या नमाजला नकार, भारताच्या मातीत पुरण्यास मनाई
डॉ. इलियासी यांनी स्पष्ट सांगितले की, भारतात मारल्या गेलेल्या कोणत्याही दहशतवाद्याच्या जनाज्याची नमाज कोणताही इमाम किंवा काझी वाचणार नाही. अशा लोकांना भारताच्या जमिनीवर दफन होण्याची जागा मिळणार नाही. त्यांनी दहशतवादाला इस्लामच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगत म्हटले की, इस्लाम हा शांतता आणि मानवतेचा धर्म आहे आणि जे लोक निर्दोष लोकांचे प्राण घेतात ते इस्लामचे शत्रू आहेत.
धार्मिक नेतृत्वाच्या भूमिकेत बदल
हा फतवा अशा वेळी आला आहे जेव्हा भारत दहशतवादाविरुद्ध 'झिरो टॉलरन्स' धोरणावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर ठामपणे उभा आहे. डॉ. इलियासी यांचे हे विधान केवळ धार्मिक नाही तर राष्ट्रीय पातळीवर एक सशक्त संदेश आहे की भारतातील मुस्लिम दहशतवादाला पाठिंबा देत नाहीत.
सामाजिक संघटना आणि नेत्यांचे कौतुक
डॉ. इलियासी यांच्या या घोषणेचे अनेक मुस्लिम सामाजिक संघटना आणि धर्मगुरूंनी कौतुक केले आहे. हे मुस्लिम समाजाकडून दहशतवादाविरुद्धच्या एकजुटीचे प्रतीक मानले जात आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार आणि सैन्याने जसा मोर्चा सांभाळला आहे, तसाच सामाजिक आणि धार्मिक नेतृत्वही आता खुल्या मनाने दहशतवादाविरुद्ध आवाज उठवत आहे.