गोव्यातील श्रीगांव येथील लईराई देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत.
पणजी - गोव्यातील श्रीगांव येथील लईराई देवी मंदिरात धार्मिक मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंदिरात अचानक गोंधळ उडाला आणि लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, घटनास्थळी अत्यंत भयावह वातावरण होते आणि लोक एकमेकांवर पडून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि मदत पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी ही माहिती दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि मदतकार्य सुरू केले. धार्मिक मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरी कशी झाली याची अधिकाऱ्यांनी अद्याप पुष्टी केलेली नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, गर्दी जास्त असल्याने आणि व्यवस्था योग्य नसल्याने हा अपघात झाला.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मापशातील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. जखमींबाबत दुःख व्यक्त करताना त्यांनी सांगितले, "शिरगाव येथे आज सकाळी लैराई यात्रेदरम्यान झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीमुळे मी अत्यंत व्यथित आहे. मी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली असून, प्रभावित कुटुंबांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे."
पंतप्रधान मोदींने व्यक्त केले दुःख
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी संवाद साधून संपूर्ण सहकार्याची हमी दिली. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी बोलून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली व या कठीण प्रसंगी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले," असे सावंत यांनी 'X' वर पोस्ट केले.
"गोव्यातील शिरगाव येथे झालेल्या चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या लोकांच्या मृत्यूमुळे मी अत्यंत दुःखी आहे. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत त्यांना माझ्या संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करत आहे," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
आठ जणांची प्रकृती गंभीर
गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मृत्यू झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिला यांचा समावेश असल्याची माहिती दिली. त्यांना मृतावस्थेतच रुग्णालयात आणले गेले होते.
आठ जखमींची प्रकृती गंभीर असून त्यापैकी दोघांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. “१०८ रुग्णवाहिका सेवेशी समन्वय साधून आम्ही तातडीने पाच रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या, तर आणखी तीन उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्या आहेत,” असे राणे यांनी सांगितले.
सर्व आवश्यक वैद्यकीय तयारी पूर्ण करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले. “प्रत्येक रुग्णाची प्रकृती आम्ही बारकाईने पाहत आहोत. जीएमसी आणि असीलो येथून नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. नियमित अद्ययावत माहिती दिली जाईल,” असेही त्यांनी सांगितले.
राणे यांनी सांगितले की, रुग्णांसाठी व्हेंटिलेटरसह स्वतंत्र आयसीयू विभाग तयार करण्यात आला आहे. अतिरिक्त डॉक्टरांचीही नियुक्ती करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
"सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत आणि प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.