सार

सध्या ती 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आपल्या वेधक अभिनयाने आणि प्रभावी संवादफेकीने अपूर्वाने छोट्या पडद्यावर आपली वेगळी छाप पाडली आहे.

मुंबई - मराठी टेलिव्हिजनमधील एक महत्त्वाचं आणि लोकप्रिय नाव म्हणजे अपूर्वा नेमळेकर. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेने तिला घराघरात ओळख मिळवून दिली. सध्या ती 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आपल्या वेधक अभिनयाने आणि प्रभावी संवादफेकीने अपूर्वाने छोट्या पडद्यावर आपली वेगळी छाप पाडली आहे.

परंतु अपूर्वाच्या आयुष्यातील यशस्वी करिअरइतकंच तिचं खाजगी आयुष्यही चर्चेत राहिलं आहे. करिअरच्या शिखरावर असताना तिचं लग्न झालं होतं. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळे त्या नात्याला घटस्फोटाच्या वळणावर यावं लागलं.

“१० वर्षं झाली, आता मी पूर्णपणे सावरलेय” अपूर्वाची स्पष्ट कबुली

अपूर्वा नुकतीच ‘आम्ही असं ऐकलंय’ या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. या संवादादरम्यान तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. ती म्हणाली: "माझं लग्न झालं होतं. आता घटस्फोट होऊनही १० वर्षं झाली आहेत. त्यातून मी आता बाहेर पडली आहे. काही गोष्टी स्वीकारायला वेळ लागला. पण या सगळ्यातून आता वाटतं मला नेमकं काय हवंय आणि काय नकोय याची क्लॅरिटी आलेली आहे."

अपूर्वाने सांगितलं की, ती आजही सिंगल आहे. पण अनेकांना ते मान्य होत नाही. तिच्या मते, लोकांना वाटतं की ती सिंगल असल्याचं उगाच सांगतेय.

"कळलंच नाही की इतके वर्षं कधी गेले... काही वर्षं दु:खात गेली, काही वर्षं स्वतःला ओळखण्यात गेली. मग काही वर्षांनी सिंगल असल्याची मजा यायला लागली," असंही तिने मनमोकळेपणाने कबूल केलं.

"लग्नसंस्थेवर अजूनही विश्वास आहे"

अपूर्वाचं म्हणणं अगदी परखड आणि विचारप्रवण होतं. ती म्हणाली: 

"माझा लग्नसंस्थेवर भयंकर विश्वास आहे. अनुभव घेण्यासाठी ही एक सुंदर गोष्ट आहे. पण, मला वाटतं की लग्न करायचं की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे."

तिने पुढे सांगितलं की, लग्न म्हणजे फक्त एक सामाजिक बंधन नाही, तर ते एक भावनिक, मानसिक आणि आत्मिक पातळीवर बांधलेलं नातं असतं, ज्यासाठी दोघांचीही तयारी आवश्यक असते.

"प्रेम, लॉयल्टी, हॉनेस्टी – हे सगळं तुम्हाला मिळणार आहे का? आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं, तुम्ही हे सगळं देऊ शकता का? हे कळणं खूप गरजेचं आहे."

तिने लग्नाचं महत्त्व अधोरेखित करत सांगितलं की,

"सामाजिक दबावामुळे किंवा फक्त लग्नाच्या समारंभासाठी लग्न करू नये. त्यामागे नात्याची खरी जाणीव आणि जबाबदारीची जाण असायला हवी."

“आता पुन्हा लग्न करायचंय”, नव्या प्रवासाची तयारी

आपल्या बोलण्यातून अपूर्वाने हेही स्पष्ट केलं की, ती आता नव्याने नात्याची सुरुवात करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहे.

"आता मी तयार आहे. पुन्हा लग्न करायचं आहे. लग्नसंस्थेचा आदर आहे आणि त्याचा एक सुंदर अनुभव पुन्हा घ्यायची इच्छा आहे," असं ती ठामपणे म्हणाली.

अपूर्वा नेमळेकरने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे केवळ अभिनयामुळे नव्हे, तर तिच्या प्रामाणिक व्यक्तिमत्त्वामुळे सुद्धा. तिच्या बोलण्यातून झळकणारी स्वतःची ओळख, प्रगल्भता आणि नात्यांबद्दलची समज ही अनेकांना प्रेरणादायी ठरू शकते. तिच्या आयुष्यातील नवीन प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होणे स्वाभाविक आहे.