सार

Ashish Ubale Suicide : प्रसिद्ध दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आल आहे. उबाळे यांनी नागपुरातील रामकृष्ण मठात गळफास घेतल्याचे सांगितले जातेय.  

Ashish Ubale Suicide : मुंबईतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व निर्माते आशिष अरुण उबाळे (वय ५८, रा. मुंबई) यांनी शनिवारी (ता. १७ मे) नागपुरातील रामकृष्ण मठात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली असून, या घटनेने चित्रपटसृष्टीसह नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

भावाच्या भेटीसाठी आले होते नागपुरात 
आशिष उबाळे हे मूळचे नागपूरच्या महाल व चुनाभट्टी परिसरातील रहिवासी होते. सध्या मुंबईत वास्तव्यास होते. शुक्रवारी सायंकाळी ते आपले भाऊ सारंग अरुण उबाळे यांना भेटण्यासाठी नागपूरात आले होते. सारंग हे धंतोली येथील रामकृष्ण मठात सेवेकरी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आशिष यांच्यासाठी मठाच्या अतिथीगृहात राहण्याची व्यवस्था केली होती.

आत्महत्येपूर्वी गळफास; व्हॉट्सअ‍ॅपवर सुसाईड नोट 
शनिवारी सकाळी जेवण केल्यानंतर आशिष उबाळे आपल्या खोलीत गेले. मात्र, बराच वेळ झाला तरी ते बाहेर आले नाहीत. दरम्यान, त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर सुसाईड नोट शेअर केल्याचे त्यांच्या भावाच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

यशस्वी सुरुवात, पण पुढे वाढती निराशा 
आशिष उबाळे यांनी पुण्यातील एफटीआय (फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट) मधून दिग्दर्शनाची पदविका घेतली होती. करिअरच्या सुरुवातीस त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. यानंतर त्यांनी श.ना. नवरे यांच्या कथांवर आधारित मालिकेचे दिग्दर्शन केले. त्यांच्या गजरा, अग्नी, एक श्वासाचे अंतर, किमयागार, चक्रव्युह अशा मालिकांना विशेष लोकप्रियता लाभली. त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट गार्गी, आनंदाचे डोही आणि बाबूरावला पकडा हे होते. यातील गार्गी चित्रपटाला कार्ल्सबर्ग फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आले होते, मात्र दुर्दैवाने गार्गी व आनंदाचे डोही हे चित्रपट पडद्यावर झळकू शकले नाहीत.

कर्जबाजारीपणा आणि मानसिक तणाव 
एके काळी नावाजलेले दिग्दर्शक असलेल्या आशिष उबाळे यांना नंतर चित्रपटसृष्टीत अपेक्षित यश मिळाले नाही. कर्जबाजारीपणामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला होता. त्यामुळे ते दीर्घकाळ नैराश्यात होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.