सार

गुहागरमधील एका पर्यटकाची लोणावळ्यामध्ये हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांना लग्नाच्या मंडपातून अटक करण्यात आली आहे. 

Crime News : पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात गुहागर तालुक्यातील युवकाची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. कोंडकारूळ (ता. गुहागर) येथील कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५) या युवकाचा लोणावळ्यात खून करण्यात आला. या प्रकरणात लोणावळा पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, त्यापैकी दोघांना थेट त्यांच्या लग्नाच्या मांडवातून अटक करण्यात आली. हा प्रकार फार्महाऊसवर गाडी वळवण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गुन्ह्यात अटकेतले आरोपी आणि तपासाची दिशा

या प्रकरणात निकेश कांबिरे, प्रतीक देशमुख, यश कैलास पडवळ (सर्व रा. वेहेरगाव तामावळ, लोणावळा ग्रामीण) आणि गौस संजय पट्टाधारी (रा. तुंगारळी, लोणावळा) यांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित पाच संशयितांचा शोध सुरू आहे.

देवदर्शनासाठी गेलेल्या पर्यटकावर हल्ला

कमलेश धोपावकर हे मच्छीमारी करणाऱ्या बोटीवर काम करत होते. समुद्रात खराब हवामानामुळे मच्छीमारी बंद झाल्यानंतर बोटीचा नाखवा आणि इतर १६ सहकाऱ्यांसह ते लोणावळ्याच्या एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. लोणावळ्यातील एका फार्महाऊसवर त्यांनी खोली भाड्याने घेतली होती.

सायंकाळी देवदर्शन करून परतताना, फार्महाऊसच्या बाहेर चार-पाच तरुणांशी गाडी वळवण्यावरून वाद झाला. फार्महाऊसच्या मालकाने वाद मिटवला, मात्र काही वेळातच तीच मंडळी एका मोटार, रिक्षा आणि दुचाकीवरून पाठलाग करत आली. त्यांनी कमलेशच्या गाडीसमोर आपली वाहने लावून अडवले आणि किल्ली काढून घेत जबरदस्त मारहाण केली.

हत्या आणि परिसरात निर्माण झालेलं भीतीचं वातावरण

या हल्ल्यात कमलेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचे सहकारी मनोज वरवाटकर आणि प्रज्वल मेहतालाही दुखापत झाली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी कमलेश यांना मृत घोषित केलं. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कोंडकारूळ गावात शोककळा पसरली असून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजकीय पातळीवरून मागणी आणि पोलीस कारवाई

या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी लोणावळा पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला असून, मृत कमलेशच्या गरीब कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत द्यावी, अशी मागणीही केली आहे.

पुढील कारवाईकडे कोकणवासीयांचे लक्ष

२५ मे रोजी रात्री उशिरा ही घटना घडली असून, लगेचच चौघांना अटक करण्यात आली. २६ मे रोजी दोघांना त्यांच्या लग्नाच्या मांडवातून ताब्यात घेतलं गेलं. उर्वरित पाच जणांचा शोध सुरू आहे. पर्यटनासाठी गेलेल्या व्यक्तीचा खून झाल्यामुळे संपूर्ण कोकणात संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.